पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलण्याचे मुख्य साधन आहे,’ असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळींचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आनंद कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ पुणे शहरातील पूरग्रस्त व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एकूण १२०० विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले.
बोपोडी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश कर्पे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अॅड. आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सचिव बाबुराव घाडगे, नगरसेविका सुनिता वाडेकर, प्रकाश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक शिरोळे, महेश कर्पे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.